संस्कृती

दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला. भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली. त्याच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ, पूजा, आराध्य दैवत वगैरे प्रथा सुरू झाल्या. आपण या प्रथा जरी वर्षानुवर्षे पाळत असलो तरी त्यांविषयीची पारंपारिक माहिती सर्वांना असतेच असे नाही. ही माहिती अत्यंत रंजक आहे. ती आपल्याला या विभागात पहायला मिळेल.

 

भोगी

bhogi पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.

भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात.

भोगी देणे – भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.

मकरसंक्रांत

makarsankrant सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण ‘ असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक ‘संक्रांत’ हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.

संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात. सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.

संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.

नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात.

सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व ‘तिळगुळ घ्या – गोड बोला’ असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.

संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे ‘बोरनहाण’ केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात.

या सणानिमित्त शुभेच्छापत्रे पाठविण्याचीही पध्दत आहे.

१४ जानेवारीशी मकर संक्रातीचा संबंध नाही

sankrant २२ डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरुवात होते. या दिवसापासून दिनमान मोठे होण्यास प्रारंभ होतो. या आनंदाप्रीत्यर्थ साजरा करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतॊ तो दिवस. मकर संक्रांतीला फ़ार प्राचीन काळापासून महत्त्व प्राप्त झाले. महाभारतात पितामह भीष्म याच दिवसासाठी काही महिने बाणाच्या शय्येवर पडून होते. या दिवशी परलोकवाशी होणारा जीव जीवनमृत्युच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्ती करतॊ असा समज आहे.

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातॊ. पंजाबमध्ये ’माघी’, मध्य प्रदेशात ’सुक्रांत’, दक्षिण भारतात ’पोंगल’, उत्तर प्रदेशात ’किचेरी’, या नावाने ओळखला जातॊ. परंतु तीळाचे महत्व मात्र सगळीकडे सारखे आहे. मकर संक्रांत १४ किंवा १४ जानेवारीला येते हे आपल्या सर्वांना माहिती आहे.

१४,१५ जानेवारीशी मकर संक्रांतीचा काहीही संबंध नाही असे प्रसिध्द पंचांगकर्ते दा. कृ.सोमण म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सूर्याने मकर राशीत प्रवेश करे पर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे आणि ६ सेकंद एवढा कालावधी लागतॊ. ग्रेगरीयन लेडर प्रमाणे लीप वर्ष गृहित धरुन सहा तासाचा हिशेब केला तर दर वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ९ मिनिटे सहा सेकंद हा काल साठत जाऊन १५७ वर्षांनी संक्रांतीचा दिवस १ दिवसानी पुढे जातो.

इसवी सन २०० मध्ये मकर संक्रांत २२ डिसेंबरला होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत संक्रात फ़क्त १४ जानेवारी येत होती. १९७२ पासून २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे जात जात सन ३२४६ मध्ये संक्रांत चक्क १ फ़ेब्रुवार रोजी येईल.दि कल्याण जनता सहकारी बँक लि. च्या सौजन्याने