हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)

hartalika हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते. तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.

पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.

श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)

shree-ganesh-chaturthi महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास बसेसची सोय केली जाते.

या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात. त्यापैकी एक घरी आणली जाते. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती आणतांना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पहातात. गणपती आणतेवेळी गणपतीपुढें काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पध्दत आहे. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणा-या व्यक्तिच्या पायावर गरम पाणी घालतात. गणपतीला व गणपती आणणा-या व्यक्तिला कुंकू लावतात, पाच सवाष्णीं गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात. गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात.

रोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, केळे-पेरू वगैरे खिरापत संध्याकाळी आरतीचे वेळी देतात. गणपतीच्या पूजेकरिता नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले-पत्री, शमी, दुर्वा, जानवे, गूळ-खोब-याचा नैवेद्य, केवडयाचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.

या दिवशी मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात.

सार्वजनिक गणपती उत्सवामधे गणेशाच्या भव्य मूर्ती चौकाचौकातून बसवितात व त्याची भव्य आरास करतात. लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पहाण्यासाठी रस्तोरस्ती हिंडतात. संगीत, नृत्य, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात.

सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो.

गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. झांज घेऊन ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.

नंतर नदीकाठची वाळू किंवा विहीरीजवळचे खडे आणून घरांत चारी बाजूला टाकतात. समज असा आहे की, चारी बाजूला वाळू किंवा खडे टाकले असतां जनावराची भिती नसते. गणपती जवळ टेवलेला नारळ नदीवर, विहीरीवर फोडावा. प्रसाद म्हणून खोबरे वाटतात. घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिरापत देतात.

काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्यावेळी गणपतीच्या जागी तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात. गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहेमीप्रमाणे आरती, मंत्रपुष्प म्हणून सांगता करण्याची पध्दत आहे.