धूलिवंदन

dhulivandan होळीच्या दुस-या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात. अंगाला फासतात व नंतर स्नान करतात.

काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे.

रंगपंचमी (फाल्गुन वद्य पंचमी)

rangapanchami वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पल्लवीने व विविध रंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला.

कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचका-या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरडया रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवितात. विशेषत: तरूण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टा-मस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते.

आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसत खेळत ह्या सणाची मजा लुटली जाते.

या सणासाठी विशेष असे पक्वान्न ठरलेले नाही.

गुढीपाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा)

gudipadwa चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.

हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन घरात रहायला जाणे, किंमती वस्तूंची किंवा स्थावराची खरेदी, सोन्याची खरेदी वगैरे सर्व गोष्टींच्यासाठी हा दिवस शुभ मानतात. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरू होते. शालिवाहन शकाची (हिंदू कालगणनेची) सुरूवात याच दिवशी झाली.

या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने खाण्याने करण्याची प्रथा आहे. कडुनिंबाच्या झाडाला या सुमारास नवीन पालवी फुटलेली असते. त्याची कोवळी पाने काढून त्यात गूळ, जिरे, चवीपुरते मीठ व लिंबू घालून वाटून गोळी बनवितात. सकाळी उठल्याउठल्या तोंड घुवून ती गोळी खाण्याची पध्दत आहे. कडुलिंब हा आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत आरोग्यकारक व कीटकनाशक आहे म्हणून ही प्रथा आहे.

या दिवशी घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडवांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या भोवती रांगोळी काढली जाते. या ठिकाणी गुढी उभारतात. गुढीची षोडशोपचारे पूजा केली जाते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतात. त्याला हळद-कुंकू वाहतात. गुढीकरीता पितळेचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ एवढे साहित्य घेतात. काठीच्या टोकाला जरीचा खण किंवा रंगीत कापड घट्ट बांधतात व त्यावर भांडे पालथे घालतात. त्यावर कडुलिंबाचा डहाळा व गाठी घालतात. घराच्या छपरावर किंवा पुढील दर्शनी भागावर ही काठी अशातऱ्हेने बांधतात की रस्त्यावरून ती सहज दिसावी. ही रंगीत कापडने शोभणारी गुढी म्हणजे रामाच्या स्वागतासाठी उभारलेल्या शुभध्वजाची प्रतिक असते. गुढी उभारल्यावर तिला हळद-कुंकू वाहण्यात येते. घराच्या प्रवेशदाराला आंब्याची डहाळी अथवा तोरण लावतात. नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करतात.

ही उभारलेली गुढी सायंकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही उतरवतात. गावात रामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण केली जाते. हळद-कुंकू, अक्षता वाहून मगच गुढी उतरवली जाते. या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत राममंदिरात कीर्तनाला प्रारंभ होतो.

या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटी-पूजन (सरस्वती पूजन) असते. पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वती काढून पाटीची अर्थात विद्येची पूजा केली जाते.

या दिवशी मुख्यत्वे करून पुरणपोळी, पुरणाची आमटी (कटाची आमटी), भजी-पापड-कुरडया वगैरे तळण, शेवयांची खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच केला जातो.


१९ वर्षांनी योग:चैत्र शुक्ल प्रतिपदा = १ सौर चैत्र

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा भारत प्रचलित अनेक कालगणनांपैकी काही पंचांगांचा आरंभ दिन आहे.तर १ सौर चैत्र (२२/२१ मार्च) हा भारताच्या अधिकृत दिनदर्शिकेचा- राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा आरंभ दिन आहे.भाषा,वेशभूषा,खानपान यांच्याप्रमाणे भारतात कालगणनेत देखील मोठी विविधता आहे.शुद्ध सौर /चांद्र-सौर ,सायन /निरयन, अमांत /पौर्णिमांत असे अनेक प्रकार भारतात प्रचलित आहेत.त्यांचे वर्षारंभ दिन सुद्धा वेगवेगळे आहेत.शुद्ध सौर पंचागातून आकाशाची माहिती मिळत नाही तर शुद्ध चांद्र पंचांगांचा ऋतूंशी ताळमेळ उरत नाही. बहुतांश भारतीय कालगणनेत या दोघांचा सुवर्णमध्य काढत चांद्र-सौर पंचांग वापरले जाते

महाराष्ट्र ,कर्नाटक राज्यात शालिवाहन संवत आणि बहुतांश उत्तर भारतात चैत्रादी विक्रम संवत प्रचलित आहे.ह्या दोन्ही चांद्र-सौर कालगणना असून त्यांचा वर्षारंभ चैत्र प्रतिपदेला होतो.या कालगणनेत चंद्राच्या प्रतिपदा द्वितीया ,तृतीया अशा तिथींवर आधारित २९.५ दिवसांचे चांद्र महिने असतात. त्यामुळे वर्षाचे ३५४ दिवस होतात.पण विशिष्ट कालावधीनंतर अधिक महिना घेऊन पुन्हा सौर पंचागांशी जुळवून घेतले जाते. धार्मिक कार्यांसाठी ,सणवार उत्सवांसाठी हि कालगणना वापरली जाते. (©विनय जोशी)२२ मार्च २०२३ ला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शक संवत १९४५ आणि विक्रम संवत २०८० सुरु होत आहे.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका असून २२ मार्च १९५७ पासून अधिकृतपणे स्वीकारली आहे.सरकारचे सर्व कामकाज,बातम्या,राजपत्र,संसदेचे कामकाज यात हिचा वापर केला जातो.राष्ट्रीय सौर दिनांक चेकवर लिहिणे ग्राह्य आहे. हि शुद्ध सौर कालगणना असून एका वर्षात ३६५. २४ दिवस असतात. यातले १२ महिने सौर म्हणजे सूर्यावर आधारित असून त्यांची नावे मात्र चैत्र,वैशाख हीच आहेत(फक्त मार्गशीर्ष चे नाव आग्रहायण आहे ).पण यात तिथी नसून १ ते ३१ अंकांनी दिवस मोजले जातात.नवीन वर्षाची सुरवात १ सौर चैत्र म्हणजे २२ मार्चला (लिपवर्षात २१ मार्च )होते.२२ मार्च २०२३ ला १ चैत्र १९४५ सुरु होत आहे.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित कालगणना आहे.नवीन वर्षाची सुरवात भारतीय सौर १ चैत्र वसंत संपात दिनी म्हणजे २२ मार्चला होते.या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. या नंतर तीन महिन्यांनी सौर १ आषाढ- २२ जूनला सूर्य कर्कवृत्तावर दिसत असताना दक्षिणायन सुरु होते. पुढे २३ सप्टेंबरला शरद संपात दिनी सहा महिने पूर्ण होऊन सौर १ अश्विन येतो. या वेळी पुन्हा दिवस-रात्र समान असतात. तर २२ डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन सौर १ पौष येतो. अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.

राष्ट्रीय दिनदर्शिका शुद्ध सौर असल्याने त्यात वर्षारंभ दिन नेहमी २२ मार्चला(लिपवर्षात २१ मार्च ) येतो. शालिवाहन/विक्रम संवत चांद्र-सौर असल्याने चैत्र शु प्रतिपदा नेहमी एकाच तारखेला येत नाही. पण दर १९ वर्षांनी चंद्राची तिथी पुन्हा त्याच दिनांकावर येते. याला मेटॉनिक चक्र म्हटले जाते. दर १९ सौर वर्षांनी ३६५. २४ X १९ = ६९३९.६ दिवस पूर्ण होतात.तर याच कालावधीत चांद्र वर्षाचे २३५ महिने म्हणजेच ६९३९. ६ दिवस पूर्ण होतात. आणि चंद्राची विशिष्ट तिथी आणि दिनांक पुन्हा एका दिवशी येतात. यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि १ सौर चैत्र हे एकाच दिवशी आले आहेत. या नंतर १९ वर्षांनी २०४२ मध्ये हा योग पुन्हा येईल.

खरतर राष्ट्रीय दिनदर्शिका ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतिक आहे. पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. दैनंदिन व्यवहारात या दिनदर्शिकेचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. ही दिनदर्शिका घरात लावणे ,जिथे जिथे इंग्रजी तारीख लिहितो तिथे सौर दिनांक सुद्धा लिहिणे,चेक,निमंत्रण ,लग्नपत्रिका वैगरे सगळ्या दैनंदिन व्यवहारात वापर करणे अशा सोप्या उपायातून हे कार्य घडू शकेल. असा प्रयत्नांतून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात रुजावी याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

विनय मधुकर जोशी
vinayjoshi23@gmail.com