कृष्णमूर्ती ज्योतिष


ज्योतिष, आपण आणि काही महत्त्वाच्या गोष्टी

‘ज्योतिष’ या विषयाचं आकर्षण हे प्रत्येक व्यक्तीला थोडया फार प्रमाणात असतंच. त्यामुळे सहाजिकच बरेच लोक ब-याच ज्योतिषांना त्यांची पत्रिका किंवा हात दाखवितात. ज्योतिषी अनेक लहान मोठे मुद्दे सांगतात. काही वेळेला काही तारखा किंवा महिने सांगितले जातात. तर असे ब-याच ज्योतिषांनी सांगितलेले बरेच मुद्दे होतात. साहजिकच एकाच व्यक्तीच्या ते लक्षात राहणं (अगदी तारीख महिन्यांसकट) हे अवघड असतं. त्यामुळे ह्यातले बरेच मुद्दे आठवणींतून निसटतात. काही वेळेला हवे असलेले मुद्दे लक्षात राहतात. व नको असलेले सोयीस्कर रित्या विसरले जातात. बरेच वेळेला ज्योतिषाकडे पत्रिका दाखवायला जाताना असलेल्या परिस्थितीवरही ते अवलंबून असते. काही वेळेला पत्रिका दाखवायला आलेल्या व्यक्तीचा मूड नसतो. तो त्याच्याच चिंतेत असल्यामुळे काही नेमक्याच गोष्टी लक्षात ठेवतो. किंवा एखाद्या वेळेला घाईघाईत पत्रिका दाखवायला आल्यामळे देखील हा गोंधळ होऊ शकतो.तर अशा वेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

त्यातील सगळयात पहिली महत्त्वाची गोष्ट ही की कुठल्याही ज्योतिषाने ज्या काही गोष्टी किंवा मुद्दे सांगितले असतील ते एका वहीत नीट लिहून ठेवावेत. ब-याच ज्योतिषांना पत्रिका दाखवली असल्यास त्या ज्योतिषाचे नाव लिहून मग त्याखाली त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे नीट लिहून घ्यावेत. काही मुद्दे लहान-सहान असले तरी लिहून घेण्यास विसरू नये. ह्या गोष्टीचे दोन महत्त्वाचे फायदे असे की, कुठल्या ज्योतिषाने काय सांगितले आहे याचा, record आपल्याकडे नीट राहतो आणि त्या प्रमाणे पुढे गोष्टी झाल्या का नाही, हे देखील कळायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्टी ही की कुठल्याही ज्योतिषाकडे जाताना कधीही कमी वेळ असताना जाऊ नये. तसेच ज्योतिषाला लवकर भविष्य सांगण्याकरिता घाई करू नये. कारण ह्याच्यात दोघांचाही फायदा नाही. ज्योतिषाकडे जाताना साधारणत: 1 तासाचा तरी वेळ घेऊन जावे. तसेच आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते नीट लिहून घेऊन जावेत, ह्याच्यामुळे ‘एखादा प्रश्न विचारायचा होता, पण आयत्या वेळेला आठवला नाही, किंवा ‘दुसऱ्या एखाद्या मुद्दयांच्या ओघात विचारायचा राहून गेला’ असं होणार नाही. एकोपक्षा जास्त व्यक्तींच्या पत्रिका दाखवायच्या असल्यास त्या त्या व्यक्तीच्या नावाखाली त्या त्या व्यक्तीचे प्रश्न लिहावेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणज, शक्यतो, ज्या व्यक्तीची पत्रिका दाखवायची आहे, त्यानेच जावे. अगदीच गरज वाटल्यास बरोबर आणखी एकच व्यक्ती असावी. पत्रिका एकाचीच दाखवायची आहे, आणि बरोबर लोकांचा घोळका अशी परिस्थिती असू नये. ह्याच्यामुळे कुणालाच शांतता मिळत नाही.

पत्रिका दाखविणाऱ्या व्यक्तीचे प्रश्न बाजूला राहतात व इतर लोकांचेच प्रश्न जास्त होतात. शक्यतोवर one to one interaction असावे. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगितलेल्या मुद्दयांवर विचार करता येतो व काही इतर शंका-कुशंका असल्यास विचारता येतात. तसेच त्या व्यक्तीला देखील सर्व मुद्दे व शंका विचारल्याचं समाधान मिळतं.चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘भविष्य’ हा फोनवर विचारण्याचा विषय नाही. त्यामुळे शक्यतो ज्योतिषाची स्वत: प्रत्यक्ष जाऊन भेट घ्यावी. व सर्व प्रश्न विचारावेत. व शंका निरसन करून घ्यावे. व्यक्ती बाहेरगावी असल्यास ई-मेलने विचारल्यास हरकत नाही. फोनवर बऱ्याच मर्यादा येतात. त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फोनचं बिल. फोन केलेल्या व्यक्तीचे लक्ष उत्तरांपेक्षा फोनच्या बिलाकडे जास्त असतं. त्यामुळे परत घाई होते व प्रश्न विचारणाऱ्याचं पूर्ण समाधान होत नाही.ज्योतिषाच्या बाबतीत दोन प्रकारच्या व्यक्ती ह्या खूप धोकादायक असतात. पहिल्या म्हणजे, कायम ‘हो’ म्हणणाऱ्या व्यक्ती आणि दुसऱ्या म्हणजे, कायम ‘नाही’ म्हणणाऱ्या व्यक्ती. काही व्यक्ती ह्या ज्योतिषाने काहीही सांगितले तरी, त्याला कायम हो म्हणतात. त्याने कुठलिही गोष्ट विचारली तरी त्याला कायम ‘हो’ म्हणतात. अशा व्यक्तींनी केवळ हो न म्हणता, नीट विचार करून ‘हो’ किंवा ‘नाही’ हे उत्तर द्यावे. ह्याच्या उलट काही व्यक्ती ह्या अशा असतात की, ज्यांना काहीही विचारले असता त्या कायम ‘नाही’ हेच उत्तर देतात. किंबहुना त्यांची ते मान्य करायची तयारीच नसते. बऱ्याच वेळेला ज्योतिषावर विश्वास नसणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त आढळतं. त्यांनी आपण ‘नाही’ म्हणायचं हे ठरवलेलंच असतं.थोडं विनोदाने सांगायचं झाल्यास, समजा ती व्यक्ती पिवळा शर्ट घालून आली आहे. आणि ज्योतिषाने त्यांना, ‘तुम्ही आत्ता पिवळा शर्ट घालून आला आहात’ असं जरी सांगितलं तरीसुध्दा ते नाहीच म्हणतील. काही वेळेला ह्या विश्वास नसलेल्या व्यक्तीचं देखील कुतूहल जागृत होतं. माझ्याकडे आलेल्या एका व्यक्तीने मी पत्रिका बघायच्या आधीच ‘मी तसा नास्तिकच आहे, आणि मी आजपर्यंत कुणालाही पत्रिका दाखवायला गेलो नाही.’ असं सांगितलं.

गमतीचा मुद्दा हा की ही ‘आजपर्यंत कुणालाही पत्रिका दाखवायला न गेलेली व्यक्ती’ माझ्याकडे पत्रिकाच दाखविण्यासाठी आली होती.पाचवा मुद्दा हा की, ज्योतिषाला पत्रिका दाखवायला गेलं असताना, मुद्देसुद बोलावं व नेमके प्रश्न विचारावेत. काही वेळेला मूळ मुद्दा बाजूला ठेवून आलेली व्यक्ती इतर गोष्टींबद्दल माहिती देत बसते. ज्योतिषाला पत्रिका बघण्यासाठी वेळ द्यावा, त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत व त्या अनुषंगाने काही इतर मुद्दे असल्यास सांगावेत.सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्योतिषाने ज्या गोष्टी सांगितल्या असतील तशा त्या गोष्टी झाल्यास किंवा न झाल्यास ज्योतिषाला feedback द्यावा. बऱ्याच वेळेला ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे गोष्टी झाल्यावर देखील ज्योतिषाला तसे कळवत नाहीत. ‘चला, आपले काम झाले आता ज्योतिषाला कशाला सांगायला हवंय?’ असं धोरणे ठेवू नये. feedback जरूर द्यावा. ह्याचे महत्त्वाचे कारण हे की, ज्योतिषाने जेंव्हा एखादी गोष्ट सांगितलेली असते ती, पत्रिकेतल्या काही गोष्टी बघून सांगितलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीने जर अमूक अमूक गोष्ट झाली असं सांगितलं तर त्या ज्योतिषाला त्याच्याकडे तशाच प्रकारचा प्रश्न घेऊन येणाऱ्या माणसाच्या बाबतीत ह्या पूर्वानुभवाचा उपयोग होतो. सातवा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या व्यक्तीची पत्रिका दाखवायची आहे, ती व्यक्ती स्वत: येणे हे फायद्याचे असते. काही वेळेला काही व्यक्ती दूरच्या कुठल्यातरी नातेवाईकांची किंवा तत्सम कुणाच्या तरी पत्रिकेविषयी विचारतात. त्यावेळेला ज्योतिषाने काही गोष्टींची खात्री करून घेण्यासाठी भूतकाळातील काही घटनांबद्दल विचारलं तर पत्रिका दाखविणाऱ्या व्यक्तीला त्याची काही फारशी कल्पना नसते, त्यामुळे problem होतो.हे असे सगळे महत्त्वाचे मुददे नीट विचारात घेऊन त्याप्रमाणे जर वागलं तर ज्योतिषी आणि जातक ह्या दोघांच्याही फायद्याचं ठरेल.ज्योतिषात आणि विशेषत: कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दतीत जन्मवेळेला अनन्यसाधरण महत्त्व आहे. त्यामुळे जर कधी पत्रिका करायची असेल किंवा इतर काही प्रश्न विचारायचे असतील आणि ज्योतिषाला जन्मवेळ सांगायची असेल त्यावेळी नीट खात्री करून घेऊन अचूक जन्मवेळ सांगावी.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com