नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

naga-panchami भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी).

तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र

नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिध्द मानले आहे. कारण वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोरण्याची शक्यता असते असे मानले जाते.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात.

या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर-खोब-याची दिंडे बनवतात.

महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुध्दा तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रध्दा आहे.

नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)

narali-purnima समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.

राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)

rakhi-purnima हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.