विविध खेळ

कुस्ती

Kusti कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.

आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.

कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.

इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता. ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.

उद्देश
Kusti मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्धास नामोहरम करणे हा आहे. त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो. मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.

विविध पध्दती
Kusti मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे. अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली. आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. विविध पध्दती प्रचलित आहेत.

भारतीय कुस्त्यांचे चार प्रमुख प्रकार पडतात ते असे

हनुमंती कुस्ती
बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील हनुमान असून त्याने बुध्दिच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रमुख्याने आढळते त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. या वरून या कुस्ती प्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.

भीमसेनी कुस्ती
शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकाराच्या कुस्तीत केवळ शरीरबलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभातात पांडवापैकी भीम हा मल्लविद्येत प्रविण होता, तसेच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंघ यांचा नि:पात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडले.

जांबुवती कुस्ती
विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पत्कारवयास लावणे, या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टीकोणातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.

जरासंधी कुस्ती
प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण नि:पात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुध्दाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराचवेळ मात करता येईना: तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सुचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टी डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.

वरील चार प्रकारांतील शरीरास इजा हाणा-या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील नीरूपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.

कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
Kusti भारतीय पध्दतीत ५*५ मी. लांबीरूंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो. त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खो-याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६*६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.

देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.

कुस्तीचे नियम
प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते. पंच व सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात. कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते. ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या वजनांचे आठ गट आहेत. काही सामन्यात प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. काही पध्दतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण उणे करण्यात येतात. त्यामुळे पुष्कळदा कमी गुण मिळवणारा विजेता ठरतो. पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.

प्रसिध्द भारतीय कुस्तीगी
भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणा-या जगज्जेत्या गामाचे नाव अजरामर झाले आहे. इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्य पद मिळविले. ह्या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिध्द आहे. गुलाम अलिया याने इ. स. १९०२ मध्ये युरोपातील सर्व प्रसिध्द मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंद ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिध्द मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिध्द पैलवानांना हरविले होते.

भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी
इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगार व खेळाडू ऍंटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रिडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधवने फ्रीस्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला. पुढे इ. स. १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. त्याच सामन्यात के. डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक लागला. इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या उदयचंद, ग्यान, एस्. श्याम, महादेवसिंग यांनी आपापल्या पहिल्या फे-या जिंकल्या व सज्जनसिंह याने दोन फे-या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही. इ. स. १९६४ च्या टोकियो सामन्यात फ्रीस्टाईल कुस्तीत विश्वंभर सहावा आला.