मराठी संत

संत नरहरी सोनार

sant-narhari-sonar वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाह असे.

ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।

संत चोखामेळा

sant-chokhamela संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ . उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. इतरांप्रमाणे आपणही श्रीविठ्ठलाला उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणा-या आहेत.

‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’

हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरी जवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.