व्यवस्थापन तणावाचे

stress management यमाने लाच घेतली असती तर लोकांनी काय काय केलं असत. आपला शेवट माहित असूनही लोक आयुष्यभर पैसा, नाव, सन्मान कमवण्याच्या मागे लागतात. काहींचा तर अगदी अट्टाहास असतो. यम लाच घेत नाही हेच यांच्यासाठी दुर्दैव! म्हणजे आयुष्यात काही मिळवायचंच नाही असं नाही; पण आपल्याला आपल्या मर्यादा समजणे उचित ठरते. अति हव्यासाच्या नादात स्वास्थ्य गमवून हे लोक तणावाला निमंत्रण देतात. तणाव आयुष्यातील अपरिहार्य भाग आहे; पण तो जीवन जगण्याचा मार्ग असू शकत नाही. प्रगती करण्यासाठी थोडा-फार ताण आवश्यकच आहे. ताण येतो म्हणून परीक्षा घेणे बंदच करा हा टोकाचा विचार ठरतो. आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. तणाव निर्माण होतो म्हणून परीक्षेला सुट्टी देण्यापेक्षा आपली मानसिक शक्ती वाढवून परीक्षेला खंबीरपणे तोंड देणे हिताचे! कारण शाळा-कॉलेजच्या परीक्षांमधून पळता येईल. जीवनाच्या परीक्षेचे काय? तिथून पळणे अशक्य. सरळ आयुष्य वळणावरचं सौंदर्य दाखवू शकत नाही. ही वळण किती मर्यादेपर्यंत घ्यायची यावर तणावाच प्रमाण ठरते.

खूप काम करण्याची आपली क्षमता, इच्छाशक्ती पाहून इतरजण आपल्यावर जबाबदारीची कामे सोपवतात. मोठेपणा मिरवायचा लोभ या सगळी जबाबदारीची कामे घ्यायला भाग पाडतो. खरेतर किरकोळ जबाबदारी जी इतर कुणीही पार पडू शकते, तीही आपल्यावर आल्याने रात्री झोप न येणे, थकवा, तणाव, मानसिक अस्वस्थता आणि ज्या व्याधी जडलेल्या नाही त्याही जडायला सुरुवात होते. जगण्याचे ध्येय बाजूला पडून जीवन तणावाने भरून जाते.

एखादी घटना आठवली तरी तणाव निर्माण होतो. तणावाला उत्तेजन देणाऱ्या घटकाला शरीर प्रतिसाद देते. मेंदूद्वारे रक्तामध्ये तणाव निर्माण करणारे स्त्राव सोडले जातात.

उदा. तुमचा एखाद्यावर राग आहे. तुमच्या मनात त्या व्यक्तीचे विचार जेव्हा येतात तेव्हा मनातल्या मनात त्या व्यक्तीने अमुक केले तर मी तमुक करीन असे डाव आखतात. कधीकधी श्वासाची गति वाढते.ती व्यक्ती समोर नसतानाही हे घडते. मेंदू बिचारा तणावाला खतपाणी घालणारी रसायन शरीरात सोडत राहतो.

असं सतत घडत राहिलं तर त्याची परिणती रक्तदाब,हृदयरोग यासारख्या आजारांमध्ये होते.

तणाव कशामुळे निर्माण होतो?

  • दु:खद घटना
  • आत्यंतिक आनंददायी घटना
  • स्वभाव गुणधर्म: संशयीपणा, कमी आत्मविश्वास, न्यूनगंड, अपराधीपणाची भावना, ईर्षा, भीती, अहंकार, राग, द्वेष.
  • आपला व्यवसाय
  • वातावरण
  • जीवघेणी स्पर्धा

तणाव टाळण्याचे उपाय

तणाव टाळणे शक्य आहे. त्यासाठी तात्पुरते आणि दीर्घकालीन उपाय करता येतात. तात्पुरत्या उपायांनी अल्पकाळासाठी तणावापासून मुक्ती मिळते तर योग, प्राणायाम, ध्यानधारणा या दीर्घकालीन उपायांनी तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी स्वतःला स्थिर ठेवता येते.

तात्पुरते उपाय

  • कुठल्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळा.
  • जे तुम्हाला आत्मविश्वास देऊ शकतात त्यांच्याशी चर्चा करा.
  • खूप जास्त कामाचा ताण आल्यास प्राधान्यक्रम ठरवून काम करा.
  • आपल्या व्यवसायापेक्षा भिन्न छंद जोपासा.
  • कुटुंबासोबत सहलीला जा, आनंदाचे क्षण आठवा.
  • डोळे बंद करून आपले आवडते संगीत ऐका.
  • रात्रीच्या वेळी चांदणे बघा.
  • दिवसातून एकदा डोळे बंद करून विचारप्रक्रिया हळूहळू थांबवा.
  • दीर्घश्वास घेऊन तो सोडत तणावालाही बाहेरचा रस्ता दाखवा.
  • श्वासाकडे लक्ष द्या.
  • व्यायाम करा.

आपले तणावमुक्त जीवन आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीच्याही आयुष्यात आनंद निर्माण करते. त्यामुळे या एका आयुष्याचा मनमुराद आनंद घ्या.

– विशाखा एस. ठाकरे