एका प्रेमाची गोष्ट

ही आहे, सांगावीशी वाटलेली एका ‘प्रेमाची गोष्ट’!…

एक बेटावर दु:ख, आनंद, श्रीमंती, मौज-मज्जा आणि प्रेम ही सारी मंडळी राहात होती. त्यांचे सर्वांचे जीवन ते तिथे सौख्याने घालवत होते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ते लुटत होते. गेली बरीच वर्षे ते सर्व एकत्रच राहात होते. आपापल्या ऐपतीप्रमाणे कुणी झोपडीत तर कुणी राजमहालात रहात होते. मर्त्य मानवाला असतात तसल्या चिंता, वैताग, व्यथा असे काही काही त्यांना नव्हते. जीवनातले गहिरे रंग संथ गतीने उधळता उधळता एकूण सारे सौख्य ते अनुभवीत होते.

आपले आयुष्य संथ-सुरळीत चालता चालता जसे एखादे वाईट विचारांचे आवर्त यावे, संकटांचे वादळ यावे- तसे एकदा त्या बेटावर एक संकट आले. समुद्राने तांडव सुरू केले. महाभयंकर प्रलय सुरू झाला. झाडे उन्मळून पडू लागली. वाडे जमिनदोस्त होऊ लागले. प्राण वाचविण्यासाठी सारे जीव सैरावैरा पळू लागले. आजवर कशाची ददात नव्हती. शिथील दिनक्रम सुरू होता… पण अचानक दु:ख, आनंद, श्रीमंती, मौज-मज्जा आणि प्रेम ह्यांना देखील ह्या अनपेक्षित संकटाचा तडाखा बसला. त्यांचे तर भानच हरपले. समुद्राचे हे अक्राळ-विक्राळ रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते. भितीने सर्वांची गाळण उडाली. म्हणता म्हणता ते सुबक-आटोपशीर बेट बुडायला लागले. प्रत्येकाचीच अवस्था दयनीय होती. काय करावे हे कुणाला उमजतच नव्हते. असल्या संकटाचा ते सारे पहिल्यांदाच सामना करीत होते.

प्रत्येक जण आपापला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. सापडेल त्या साधनाच्या साहाय्याने ते प्रलयापासून दूर पळू लागले. काही मिळाले नाही तर, इकडे धाव तिकडे धाव. नुस्ती धावाधाव चालू होती. बेटातील राजमहालाच्या सर्वात वरच्या मजलावर प्रेम राहात होते. त्याचे सर्व काही तिथे असल्याने ते सरळ धाव घेत आपल्या खोलीत गेले. आणि प्रार्थना करू लागले की हे तांडव थांबवे. ‘देवा, हे तांडव थांबव’ अशी अजिजी ते करू लागले. पण काही उपयोग झाला नाही. प्रेमाची प्रार्थना देवालाही ऐकू गेली नाही. प्रेम आपल्या खिडकीत येऊन उभे राहीले. हळुहळू पाण्याची कड प्रेमाच्या खोलीपर्यंत येऊन ठेपली. प्रेमाला वाटले, आता आपला अंत निश्चित आहे. पण आपल्या विश्वासावर त्याचा विश्वास होता. म्हणून त्याने आपल्या सर्व मित्रांना मदतीची हाक मारायला सुरूवात केली. मोठमोठयाने प्रेम आक्रंदन करू लागले.

एका छोटयाश्या नावेतून त्याला ‘दु:ख’ जाताना दिसले. त्याने ‘दु:खा’ला हाक मारली आणि विचारले, ‘हे दु:खा मला तुझ्या बरोबर नावेत घे’, पण दु:खाची नाव लहान असल्याने त्याने सांगितलं की, ‘प्रेमा मी तुला नावेत घेऊ शकत नाही’ आणि निघून गेले. मग प्रेमाला एका मोठया अवाढव्य नावेतून ‘श्रीमंती’ जाताना दिसली. त्याने ‘श्रीमंती’ला हाक मारली, आपल्याबरोबर नावेत घेण्याची विनंती केली. श्रीमंतीचे सर्व वैभव, आणि पैसा त्या नावेत होता, आणि तिला वाटले की जर आपण प्रेमाला आपल्याबरोबर घेतले तर हे सर्व गमवावे लागेल कारण नावेला जास्त वजन पेलवणार नाही. त्यामुळे आपल्याबरोबर न घेण्याचे कारण श्रीमंतीने प्रेमाला सांगितले आणि ती निघून गेली.

पाण्याची कड आता खिडकी जवळ आली. आता आपला जीव आपण वाचवू शकत नाही असे प्रेमाला वाटले. अचानक त्याला विमानमार्गे ‘आनंद’ जाताना दिसला. प्रेमाने त्याला खूप खूप हाका मारल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला जीव वाचला ह्या आनंदात तो इतका मशगुल झाला की त्याला प्रेमाची हाक ऐकू आलीच नाही. प्रेम अगदी निराश झाले. खंतावले. पण मग पुन्हा एक आशेचा किरण प्रेमाला दिसला. त्याला ‘मौज-मज्जा’ जाताना दिसले. प्रेमाने त्यांना करूणेने हाक मारली. आणि आपला जीव वाचविण्याची विनंती केली. पण मौज-मज्जांना त्यांच्या मध्ये इतर कुणीच नको होते. त्यामुळे ते सुध्दा तेथून निघून गेले.

हताश प्रेमाने दमून एक दीर्घ नि:श्वास टाकला. आता आपली जगण्याची उमेद संपली आहे, असे त्याला वाटले. आता काहीच पर्याय नाही असे त्याला जाणवले. त्या समुद्राच्या उग्र तांडवाला प्रेम घाबरत होते. त्याला कुठलाच मार्ग दिसत नव्हता, पण तरीही परिस्थितीला तोंड तर द्यायचे होते.

मग अचानक ध्यानीमनी नसताना एक बोट आली. त्यातून एक हाक आली. ‘माझ्याबरोबर ये’ एवढा आवाज ऐकल्यावर प्रेमाने ताबडतोब त्या बोटीत उडी घेतली. कारण वेळच नव्हता. पाणी वर चढले होते, त्याची खोली पाण्याने भरलेली होती…

प्रेमाने आपले प्रिय बेट बुडताना पाहीले. आपले मित्र, त्यांचा सहवास त्याला आठवत राहीला. झाल्या प्रकाराने जबर मानसिक आघात त्याला पोहोचला होता. ते इतके घाबरले होते की डोळयातले पाणी गाळता गाळता त्याला ग्लानी आली. ते झोपी गेले.

एका किना-यालगत एक बोट येऊन थांबली त्यातून प्रेम उतरले. अजूनही ते पुरते सावरले नव्हते. काही काळ गेल्यावर प्रेमाला जरा तरतरी वाटू लागली. ह्या नव्या बेटावर पूर्वीच्या बेटापेक्षाही जास्त चैतन्य होते. पूर्ण हुशारी वाटू लागल्यावर, शुध्दीत आल्यावर प्रेमाने तिथल्या एका व्यक्तीला विचारले की, ‘ह्या प्राणघातक संकटातून मला कुणी वाचविले?’ त्याने सांगितले ती वेळ होती!

ख-या प्रेमाची ओळख ‘वेळं’च सांगू शकते. ह्या जीवनात आनंद, श्रीमंती, दु:ख, मौज-मज्जा आपले नाहीत. ते येतात नि जातात. आपल्याला खरी साथ दिली ती ‘वेळ’ होती. प्रेमाला आपले खरे माणूस कोण ते आता कळून चुकले होते. वेळेला गाठण्याची योग्य वेळ कुठली ह्याचा आता प्रेम विचार करीत होते…

कथा – वैशाली गिते