मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

क्षितीज

दूर त्या टोकाला
पाणी स्पर्श करते क्षितीजाला
त्या क्षितीजाच्या गर्भातून फुलतो
रोज उष:काल नवा
क्षितीज म्हणजे असतो
विसावा निशेचा
जो रोज पाठवितो उषेबरोबर
नवा किरण आशेचा
क्षितीजाच्या त्या विशाल गाभा-यात
ध्येय आपले दडलेले असते
त्या क्षितीजापर्यंत पोहोचण्यासाठी
क्षितीजच मदत करत असते
क्षितीजापर्यंत जाणा-या वाटेचा
अंत आपल्याला माहित नसतो
तरीही ते क्षितीज गाठण्यासाठी
आपण वाटचाल करीतच असतो

स्वाती गोडे

आई

दुर जरी असशील
मनामध्ये माझ्या वसते
तुच आधार माझा
तुझ्याविना मन झुरते
तुच निशा माझी
तुच उषा माझी
तुझ्याविना नसती
या जगात भूमिका माझी
दु:ख माझे सारे
तु तुझ्या पदरानी घेरते
सुखाचा वर्षाव
माझ्यावर करते
माझ्या एकटेपणात
विश्वास तु मला देतेस
दु:खातून चालायला
सुखातून तू शिकवतेस

कु. विनिता ताजणे

असचं चालायच

हे असचं चालायचं हे असचं चालायचं
आम्ही तुमच्याकडं बघायचं
तुम्ही आमच्याकडं बघुन न
बघीतल्यासारखं करायचं
हे असचं चालायचं हे असचं चालायचं

तुम्ही शिकण्यासाठी शाळेत जायचं
आम्ही तुमच्यासाठी शाळेत जायचं
दिवसभर आम्ही तुमच्या
गल्ली बोळातून फिरायचं
तुम्ही गच्चीत राहून उगीचचं
आमच्याकडं बघायचं
हे असचं चालायचं हे असचं चालायचं

अचानक तुमचं लग्न ठरायचं
तुम्ही आम्हाला लग्नाला नाही बोलवायचं
तरीपण आम्ही लग्नाला यायचं
कचकून खायचं दचकून रडायचं
हे असचं चालायचं हे असचं चालायचं

एके दिवशी तुम्ही सासरहून माहेरी यायचं
तुमच्या कडेवर बाळं असायच
बाळं आमच्याकडं बघून गुलू गुलू हसायचं
आणि बाळाला तुम्ही हळूचं विचारायचं
बाळा मामाकडं जायचं
हे असचं चालायचं हे असचं चालायचं
हे असचं चालायचं हे असचं चालायचं

उमेश

स्वार्थी

कुणीच नाही कुणाचे ह्या जगाता
जो तो आपला स्वता:चाच असतो.
मरावे मरावे म्हटले तरी. मरण काही सहजी येत नाही
मरण येत नाही म्हणूनच जगायचे असते.
ज्यांना आपले म्हणावे तेच होतात परके
जे येतात जवळ ते फक्त त्यांच्या स्वार्थापुरते
स्वार्थ साधला नाही तर तेही जातात दूर
मनात राहतात फक्त त्यांच्या आठवणी
त्यांच्यासाठी मनात असते हूरहूर
वाटते त्यांनी रहावे सतत आपल्या समोरच
पण ते जातात दूर दूरच
म्हणूनच या जगात कोणीच कोणाचा नसतो
जो तो स्वता:चा असतो.

संदिप मोरे