मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

होळी आणि धुलिवंदन

होळी आणि धुलिवंदन
वाईट प्रवृत्ती अन् दुष्कृत्यांची,
प्रतिके मानूनी दिली पेटवूनी होळी.
पुजा करुनी मानुनिया देवता,
अर्पिला नैवेद्य तिजला.
गाठी, श्रीफळ, पुरणपोळी,
साजरी झाली होळी. ॥1॥

बोंबा मारुनी केला शिमगा,
अरे, अमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
तमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
अनेकांचा होळीनिमित्त,
तिर्थ प्राशनाचाही कार्यक्रम झाला.
कारण, दुस-या दिवशी होती सुट्टी,
साजरी झाली होळी. ॥2॥

उल्हासित मनाने सुर्यनारायण आले,
धुलिवंदन सुरू झाले.
रंगीबेरंगी रंगांची झाली बरसात,
होता संगे पाण्याचाही वर्षाव.
फुगे पाण्याचे झेलीत होती तने,
तनाबरोबर भिजत होती मने.
आबालवृध्द सारे रंगात रमले,
चंदेरी, लाल, निळे, केशरी, हिरवे,
नवनिर्माण सेना ही भासे.
‘रंगीत वस्त्रे’ ही तारुण्याची ल्यालेली तरुणाई
नाचत, गात, फिरत होती गाडयांवरूनी.
सुर्यास्तासमयी पांगले सारे,
धुलिवंदन साजरे झाले. ॥3॥

दुःखित मनाने सुर्यनारायण आले,
अरेरे ! काल दिवसभर हे काय झाले?
सा-या रस्त्यांना लाल रंगाचा मुलामा झालेला,
आणि तयावर पिशव्यांचा खचही साचलेला.
त्यामुळेच होती गटारेही तुंबलेली,
कुठे गेला कायदा? अन् प्लॅस्टिकबंदी.
रंगीत रसायने गेली होती शरिरात,
ब-याचजणांना दुखत होते पोटात.
कितीतरी जण वाहून गेले पाण्यात,
काही बळी गेले अपघातात.
हे होते कमी म्हणून दंगलही झाली,
विकृती अन् दुष्कृत्यांच्यी परवा केली होळी,
काल पुन्हा सुरुवात झाली.
आता फाल्गुन पौर्णिमेपर्यंत असेच चालणार,
आणि तेव्हा आपण होळी साजरी करणार ॥4॥

अद्वैत यशवंत कानडे

गुढीपाडवा

वेध लागले पाडव्याचे,
मांगल्याच्या या सणाचे,
नव-वर्षाच्या स्वागताचे.
पुजा करावी ज्योतिर्मयाची,
कशास आराधना तमसाची?
रात्री बारा वाजता काय बदल होतो?
दिवस सुर्योदयसमयी बदलतो.
नको जागरण एकतीस तारखेसारखे,
उठू लवकर, अभ्यंग करू लाऊनी उटणे
वेध लागले पाडव्याचे ॥1॥

सडा शिंपूनी रांगोळी काढू,
गुढी उभारू तोरणे बांधू,
आपण आपली संस्कृती रक्षू,
भोजनास श्रीखंड-पुरीचा बेत आखू,
आप्तेष्टांसमवेत आस्वाद घेऊ,
श्रीखंडाप्रमाणे गोड सर्वांशी वागू,
या मंगलदिनी, या शुभदिनी, या एका मुहूर्तदिनी,
हाच संकल्प करूनी, सिध्दीचाही यत्न करू,
करू मनी मनसुबे, सर्वांना नुतनवर्ष शुभेच्छा देण्याचे,
वेध लागले पाडव्याचे ॥2॥

अद्वैत यशवंत कानडे

मनस्वी

आळवाच्या पानावर
पाणी थांबत नसतं
तरी…
एखादा मनस्वी थेंब
जागा हेरून बसतो;
बंडखोर वारा देतो धक्के
पण थेंबाचे मनसुबे पक्के;
पानाची मखमल
अन् थेंबाची चमक
दोन्ही किती एकरूप असतात;
थेंबासाठी पान
पानासाठी थेंब
वा-यावर झुलत
हळूच हसतात

नितल वढावकर

कर्तव्य

एकदा एक कोकिळा
म्हणाली कावळीणीला-
‘माझं पोर तुझ्या घरात वाढलं तरी
आता गोड गाऊ लागलंय.’
कावळीण म्हणाली, ‘भरून पावलं,
माझ्या कर्तव्यात कसूर नाही सिध्द झालं.
माझंच समजून तुझ्या पोराला वाढवलं
पण त्याला कावळा नाही होऊ दिलं.’

नितल वढावकर