बहिणाबाई चौधरी – मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री

Bahinabai Chuadhari विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता, शिकलेला आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं.

बहिणाबाईचा जन्म जळगावपासून २ कि. मी. अंतरावरील असोदे गावचा. असोदे गावातील प्रतिष्ठित महाजन घराण्यात त्या जन्माला आल्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षीच बहिणाबाई चौधरींचा, जळगावातील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईना सर्वांचा स्नेह लाभला. पण अगदी तरुणपणीच त्यांना वैधव्य आले. सुरुवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नव-याच्या मृत्युनंतर बहिणाबाईना अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली एक कन्या काशी आणि दोन पुत्र ओंकार आणि सोपान यांच्यावर चांगले संस्कार घडवले.

घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतेच. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यांत स्त्रियांचे जीवन बांधले गेले होते. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाटयाला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता. तो होता काव्याचा. वर्षभरातील सणांना एकत्र जमून परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हेच माध्यम होते आणि तेच स्त्रियांनी निवडले. त्यामुळेच मराठीला समृध्द अशी स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा लाभली. स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा समृध्द आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी.

बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या-नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते. त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.

बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रुपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. बहिणाबाईचे आयुष्य शेती आणि घर अशा दोन टप्प्यांतले असल्यामुळे निसर्गविषयक काव्य करताना त्यातून आपोआपच आपल्याला शेतीशी संबंधित ब-याच घटनांचे चित्रण जाणवते.

पेरणीच्यावेळी पाऊस यावा ही शेतक-यांची इच्छा असते. पाऊस येण्याचीही वेळ झालेली असते. अशावेळी बहिणाबाई सहज म्हणून जातात.

“पेरनी पेरनी भीज भीज धर्ती माते
बिय बियान्याचे भरून ठेवले पोते ”
पेरणी चांगली झाली. भरभरून शेती झाली. चांगली पिकं
आली. ते बघून बहिणाबाईना काव्य स्फुरले –
बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले व-हे,
गह्यरलं शेत जसं, अंगावरती शहारे”

शेतक-यांच्या जीवनाचं यथार्थ चित्रण आपल्याला बहिणाबाईच्या कवितांतून पाहायला मिळते. त्यांच्या दुःखाचे, सुखाचे, कष्टांचे चित्र आपल्या डोळयांसमोर बहिणाबाईचे काव्य वाचताना जिवंत होते.

काव्यातील स्त्रीजीवन –

स्त्री मग ती कुठचीही असो तिला माहेरची ओढ सदैव लागलेली असते. हीच माहेरची ओढ आपल्याला बहिणाबाईच्याही अनेक कवितांतून जाणवते. जसे,

“लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेराची वाट, माले वाटे मखमल”

पण माहेराचे कौतुक म्हणजे सासरचा दुस्वास नव्हे. बहिणाबाईच्या कवितांतून माहेरचे वर्णन जितके आणि जसे येते तितक्याच वेळा आणि त्याच सहजतेने त्या सासरचे, सासरच्या माणसांचे वर्णन करतात. उदाहरणार्थ,

“खटल्याची घरामधी, देखा माझी सग्गी सासू,
सदा पोटामधी माया तसे डोयामधी आंसू ”

सासर-माहेर ह्या दोन विषयांपुरतेच त्यांनी आपल्याला बांधून घेतलेले नाही. तर त्यापेक्षा कितीतरी अधिक विषय आपल्याला बहिणाबाईच्या कवितांतून जाणवतात.

आत्मविषयक काव्य –

अगदी तरुणपणी वैधव्य आल्यावरही खचून न जाता धीराने ह्या परिस्थितीला बहिणाबाई सामो-या गेल्या. माझी कीव करू नका असं त्या आजूबाजूच्या बायकांना सांगतात.

” नका नका आया बाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा माले जीव ”

काव्यातील अध्यात्म –

त्यांनी काही कवितांतून वापरलेल्या उपमा अगदी चपखल आहेत. ‘घरोटयाला’ म्हणजे ‘जात्याला’ बहिणाबाई भरल्या आभाळाची उपमा देतात. त्यातून माणसाला जगवणारं पीठ येतं. म्हणून त्या म्हणतात –

“ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही ”

स्वार्थ सोडून माणसाने कधीतरी त्यागाचा मार्गही अवलंबला पाहिजे, असा उपदेशही बहिणाबाई जाता जाता करतात.

” नको लागू जीवा, सदा मतलबासाठी
ही रिताचे देनं घेनं नही पोटासाठी ”

‘मन’ या कवितेत माणसाचं मन कसं आहे हे शब्दांत पकडण्याचा प्रयत्न त्या करतात.

” मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोरं
किती हाकला हाकला
फिरी येते पिकांवर ”

मन किती चपळ आणि ओढाळ असतं याचं यापेक्षा अचूक वर्णन अजूनतरी कोणाला जमलेले नाही. याचं मनाचं वर्णन त्या ‘कधी खसखशीएवढं बारीक तर कधी आभाळाएवढं विशाल’ असंही करून जातात.

बोधप्रद काव्य –

सुगरणीच्या खोप्याचं उदाहरण देऊन बहिणाबाई माणसांना सुंदर संदेश देऊन जातात –

” अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला
पिलं निजले खोप्यात, जसा झुलता बंगला
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी, जरा देख मानसा
तिची उलूशीच चोचं, तेच दात तेच ओठ
तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोटं ”

सुगरणीचा जीव एवढासा असूनही ती आपल्या पिलांसाठी किती सुंदर घरटं बनवते. माणूस हा सुगरणीपेक्षा कितीतरी शक्तिशाली मग माणसा तू तर अधिक काही करून दाखवू शकतोस असा सवाल त्या माणसाला विचारतात. अगदी साध्या शब्दांतूनही फार मोठा अर्थ त्या समजावून देतात.

विनोदी रचना –
बहिणाबाईंनी काही काव्यातून विनोदी रचना केलेली आहे. ह्या विनोदी रचनांतून त्यांनी काही व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ‘मुनीर नावाचा शिपाई’, ‘छोटू भय्याचे पोटाचे वर्णन’ करणारी कविता, ‘काळया पोरीला’ उद्देशून केलेली कविता अशा काही कविता विनोदी बाजाच्या आहेत.

सामाजिक आणि उपदेशात्मक काव्य –
काही सामाजिक समस्या बहिणाबाईनी काव्यातून मांडल्या आहेत. जसे,

” देख महारवाडयांत, कशी माणसाची दैना
पोटामधी उठे आग, चुल्हा पेटता पेटेना ”
किंवा
” ऐका संसार, संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दुःखाला होकार
अन् सुखाले नकार ”

ह्या चार ओळींत त्या संसाराचे सारे गुपित सांगून जातात. त्यांची ‘कशाले काय म्हनू नही’ ही रचना मराठी माणसाच्या मनाला भुरळ पाडणारी आहे. शेतकरी जीवनातल्या अनुभूतींचा ह्यातून प्रत्यय येतो. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा ह्यातून प्रत्यय येतो.

” बिया कपाशीन उले
त्याला बोंड म्हनू नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनू नाही
नाही वा-यानं हाललं
त्याले पान म्हनू नाही ”

बहिणाबाईच्या या स्फुट ओव्यांतून माणसाला जीवनाचे दर्शन घडते.

एक दिवस शेतात काम करणा-या शेतकरी बायकांनी बहिणाबाईना विचारलं की, “तुम्ही तर आमच्या सारखंच शेतात काम करता? मग तुम्हाला एवढं कसं सुचतं? ”

यावर बहिणाबाई उत्तरतात,

” माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिणाईच्या मनी
किती गुपितं पेरली,
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता भागवत
पावसांत समावत
माटी मधी उगवतं ”

बहिणाबाईच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव-धुळे जिल्ह्यातील अहिराणी बोली प्रकाशात येते. अहिराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते.

मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणा-या बहिणाबाई चौधरी. पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे जाणून घेण्याकरता तरी एकदा का होईना बहिणाबाईच्या काव्याचा आस्वाद घेतला पाहिजे.