विश्राम बेडेकर – मानाचा मुजरा : एका दीपस्तंभाला!

Vishram Bedekar नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे जन्मशताब्दी वर्ष. वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे.

चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून ‘रणांगण’ सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र ‘वाजे पाऊल आपुले’ आणि ‘टिळक आणि आगरकर’ या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती.

चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा त्यांना मिळालेला योग्य सन्मान!मराठी सारस्वताच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी १३ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. या निमित्ताने ‘एक झाड आणि दोन पक्षी’ हे त्यांचे आत्मचरित्र पुन्हा एकदा १० वर्षांनी प्रकाशित होतेय. पॉप्युलर प्रकाशनातर्फे हे पुस्तक १३ तारखेला पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे.

विजय तेंडुलकर

vijaytendulkar विजय तेंडुलकर प्रख्यात भारतीय नाटककार, पटकथाकार, साहित्यिक निबंधकार, राजकीय पत्रकार आणि सामाजिक भाष्यकार म्हणून सुपरिचित आहेत. गेली चार दशके विजय तेंडुलकर हे रंगभूमीवरील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून साहित्यिक वर्तुळात प्रसिध्द आहेत.

मुंबईवासीय विजय तेंडुलकर (जन्म १९२८) यांची ३० नाटके आणि २३ एकांकिका प्रकाशित झाल्या आहेत. श्री. तेंडुलकरांचे लिखाण मराठी साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आणि आधुनिक विचारांचा साहित्यसृष्टिला परिचय करून देणारे ठरले आहे. त्यांनी आपल्या नाटकांमधून नेहमीच विचित्र मानवी नातेसंबंध आणि त्यांची गुंतागुंत मांडली आहे. त्यांच्या नाटकांमधून नेहमीच मध्यमवर्ग आणि त्यांच्या समस्या, भावभावना, नातेसंबंध यांचे दर्शन घडले आहे.

शांतता ! कोर्ट चालू आहे (Silence ! The Court Is In Session, 1967), सखाराम बाइंडर (Sakharam the Book-Binder, 1972), कमला (Kamala, 1981) आणि कन्यादान (The Gift of a Daughter, 1983) ही काही त्यांची महत्त्वाची नाटके आहेत. लोककलांच्या संगीतमय सादरीकरण वैशिष्टयांच्या अंगाने जाणारे आणि आधुनिक नाटयतंत्राचा वापर करणारे, सर्वात जास्त काळ चाललेले, मराठी आणि भाषांतरीत रुपांतराचे 6000हून अधिक प्रयोग झालेले हे तेंडुलकरांचे एक महत्त्वाचे नाटक आहे.

विजय तेंडुलकरांच्या इतर साहित्यामध्ये लहान मुलांसाठीच्या ११ नाटिका, लघुकथांची ४ संकलने, १ कादंबरी, साहित्यिक निबंधांचे ५ खंड आणि सामाजिक समीक्षा यांचा समावेश होतो. भारत आणि विशेषतः महाराष्ट्रातील साहित्यिक क्षेत्रात लक्षणीय रुपांतर घडवून आणण्यात तेंडुलकरांच्या साहित्याचा विशेष हातभार आहे. मराठीतील प्रमुख भाषांतरकार म्हणूनही त्यांचे नाव घेता येते, यामध्ये नऊ कादंब-या, दोन आत्मचरित्रे, पाच नाटके यांचा समावेश आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरे (हिंदी), गिरीश कर्नाड यांच्या तुघलक (कन्नड) आणि टेनेसी विल्यम्स यांच्या ए स्ट्रिट कार नेम्ड डिझायर (इंग्लिश) या काही महत्त्वाच्या नाटकांचा समावेश होतो.

मराठीतील काही महत्त्वाच्या चित्रपटांचे कथाकार आणि पटकथाकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. यामध्ये सामना (१९७५), सिंहासन (१९७९) आणि भारतातील स्त्री-चळवळींवरील मैलाचा दगड ठरलेल्या उंबरठा (१९८१) या चित्रपटांचा समावेश होतो.