कृष्णमूर्ती ज्योतिष


कौन बनेगा दिग्गज?

अमित आणि अभिजीत नावाचे दोन मित्र होते. दोघेही एकाच शहरात, एकाच कॉलेजात, एकाच वर्गात होते. दोघेही अभ्यासात तसे बरे होते पण अभिजीतला शिक्षणापेक्षा गाण्यामधे जास्त रस होता. त्याचा आवाज देखील चांगला होता. तर, याउलट, अमितला गाण्यासारख्या वायफळ गोष्टीत अजिबात रस नव्हता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर, अभिजीतने ‘झालं तेवढ शिक्षण पुरे’ असं म्हणून शिक्षणाला राम राम ठोकला आणि गाण्यात करिअर करायचं ठरवलं तर अमितने एका बँकेत नोकरी मिळवली आणि कर्ज ठेवीच्या हिशोबात हरवून गेला. आज, काही वर्षांचा काळ उलटल्यानंतर देखील दोघांची मैत्री अजुनही कायम आहे पण अभिजीत यशाच्या पाय-या चढत चढत आज एक आघाडीचा सर्वोत्तम पार्श्वगायक आहे तर अमित आजही त्याच बँकेत ठेवीदारांचे हिशेब ठेवण्यात गर्क आहे. अमितने जर आज कोणाला सांगितले की अभिजीत हा त्याचा चांगला मित्र आहे तर लोक चटकन विश्वास ठेवत नाहीत. थोडक्यात काय, तर अभिजीत आज ‘दिग्गज’ आहे तर अमित ‘कोणीही नाही.’

दिग्गज म्हणजे एखाद्या क्षेत्रात अत्युच्च पदाला पोहचलेली व्यक्ती. दिग्गज हे फक्त कलेच्या क्षेत्रात किंवा राजकारणातच असतात. असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो तात्काळ दुर करा. दिग्गज हे कुठल्याही क्षेत्रात असु शकतात. ह्रदयरोगतज्ञ नीतु मांडके हे दिग्गज होते. मेधा पाटकर, जयंत नारळीकर, जयंत साळगावकर, बिल गेट्स हे सगळे दिग्गज आहेत. अशी वेगवेगळया क्षेत्रातील नावे सांगता येतील.

दिग्गज होण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्रिकेत काही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. दिग्गज होण्यासाठी जी एक गोष्ट पत्रिकेत सगळयात महत्वाची असते ती म्हणजे त्या व्यक्तीचं करिअर.

त्या व्यक्तीचं करिअर फक्त चांगलं नाही, तर, खूप चांगलं असावं लागतं तरच ती व्यक्ती ‘दिग्गज’ होऊ शकते, अन्यथा नाही आणि हे करिअर खूप चांगलं होण्यासाठी सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या आयुष्यात वय वर्ष २० ते ६० यामधे येणारे काळ, या काळांनाच महादशा अंतर्दशा म्हणतात. दिग्गज होण्यासाठी वय वर्ष २० ते ६० यामधले काळ हे चांगलेच असावे लागतात, कारण माणसाचं कार्य करण्याच आयुष्य हे साधारण २० ते ६० मधेच असतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रिकेतील स्थान, पण यासाठी आपल्याला थोडं पत्रिकेच्या तांत्रिक बाबीत खोलात जावं लागेल. दिग्गच होण्यासाठी पत्रिकेतील ३ स्थानं फार महत्वाची असतात. ती म्हणजे दशम स्थान, धन स्थान व लाभ स्थान. दशम स्थान हे कर्म स्थान आहे. व्यक्तीच करिअर ह्या स्थानावरून बघतात, म्हणजे नोकरी, धंदा वगैरे. त्यामुळे ह्या स्थानाच महत्व आहे. धन स्थान म्हणजे नावाप्रमाणेच धन, संपत्तीदर्शक स्थान आहे. दिग्गज होणारी व्यक्ती ही सहसा काही अपवाद वगळता गरीब किंवा मध्यमवर्गीय नसते तर श्रीमंतच असते. त्यामुळे ह्या स्थानाचं देखील महत्व आहे. तर लाभ स्थान हे एक अत्यंत शुभ स्थान तसचं इच्छापूर्तीच स्थान मानलेलं आहे. कुठल्याही घटनेचा संबंध हा जर लाभ स्थानाशी असेल तर अधिक चांगलं, जसं अ+, हा जो + आहे, तो म्हणजे लाभ स्थान. तर ही झाली स्थानं, आता दिग्गज होण्यासाठी, २० ते ६० मधल्या महादशा ह्या धन, दशम व लाभ स्थान यांच्याशी अगदी उत्तमरित्या संबंधीत असाव्या लागतात, तरचं ती व्यक्ती दिग्गज होऊ शकते. प्रयत्न आणि कष्ट सगळेच जणं करतात पण सगळेच दिग्गज होत नाहीत, कारण केलेल्या कर्मांच अत्यंत शुभ फल मिळाल्याशिवाय कोणी दिग्गज होऊच शकत नाही आणि हे महान कार्य किंवा महान कर्म आणि त्याचं पुरेपुर फल हे तेव्हाच मिळु शकतं जेव्हा महादशा ह्या दशम व लाभ स्थान उद्दीपीत करतात.

दिग्गज होण्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रात असे त्या क्षेत्रासंबंधीत ग्रहाचा पत्रिकेवर खूप अंमल असावा लागतो, हे अशासाठी की एखादी व्यक्ती १० गोष्टीत तरबेज असली तरी एक व्यक्ती एका जन्मात ‘एकाच’ क्षेत्रात दिग्गज होऊ शकते. काही वेळेला असही होते की एखादी व्यक्ती दिग्गज होण्यापूर्वी एखाद्या वेगळयाच क्षेत्रात कार्यरत असते पण पुढे त्या व्यक्तीचं क्षेत्रं बदलतं आणि त्या क्षेत्रात ती व्यक्ती पुढे दिग्गज होते. डॉ. श्रीराम लागू हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले पण पुढे कलाक्षेत्रात दिग्गज झाले. माननीय बाळासाहेब ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार होते आणि आहेत पण राजकारणात दिग्गज झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. याचा अर्थ एवढाचं की, एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रात दिग्गज होणार असते त्या क्षेत्राकडे ती आपोआप खेचली जाते.

दिग्गज होण्यासाठी चवथी महत्वाची गोष्ट म्हणजे महादशांचं सातत्य. हे सातत्य. अशासाठी की, एखादी व्यक्ति जेव्हा एखाद्या क्षेत्रात दिग्गज होते, ती काही एका दिवसात होत नाही., तर दिग्गज होण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून ती त्या क्षेत्रात कार्यरत असते आणि बराच काळ एखाद्या क्षेत्रात कार्यरत रहाण्यासाठी आवश्यकता असते ती सातत्याची. जर कार्यात खंड पडला तर दिग्गज होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. सातत्यामुळे बडया दिग्गजांची कारकिर्द ही नुसती अखंडीत नसून दिर्घ कारकिर्द देखील आहे. उदा. बाबा आमटे, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन असे अनेक दिग्गज अनेक वर्ष होऊन देखील आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेतच.
काही दिग्गजांच्या पत्रिकेत मात्र आयुष्याच्या उत्तरार्धातल्या महादशा फारशा चांगल्या नसतात त्यामुळे त्या काळात त्यांची पडझड होते, अपयश येतं, आर्थिक स्थिती खालावते वगैरे वगैरे! दिग्गजांचा जो एक तिसरा विभाग आहे., त्यात काही असे दिग्गज आहेत की ज्यांची कारकिर्द आता संपली आहे, ते आता कार्यरत नाहीत पण त्यांची पडझड देखील झालेली नाही, त्यांचे आयुष्य ते मजेत घालवत आहेत, पण, आजही जनंमाणसात त्यांच्या पूर्वीच्या कार्याची दखल घेतली जाते. दिग्गज हे कधी (काही अपवाद वगळता) नोकरदार आढळत नाहीत.

यशासारखं फक्त यशच असतं असं कुठेतरी म्हटलेलं आहे. ज्यांच करिअर चांगलं असतं ते जीवनात नक्की यशस्वी होतातंच पण दिग्गज होण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी जुळून येणं वाटते तितके सोपे नाही. पाऊस पडत असताना अथांग सागरात अनेक पावसाचे थेंब पडत असतात पण शिपल्यात पडलेल्या पाण्याच्या थेंबाचाच मोती होतो, बाकीचे थेंब नुसतेच सागराच्या पाण्यात भर घालतात. कुठला थेंब शिंपल्यात पाडायचा आणि कुठला नुसताच सागरात, हे त्या विधात्याच्याच हातात! आपण फक्त पत्रिकेच्या माध्यमातून हे ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो की, कौन बनेगा दिग्गज?’

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com